- प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा - उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायला शिकावे; आंबेडकरांचा टोला पुणे/ प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनवरुन वंचित ...
- प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा
- उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायला शिकावे; आंबेडकरांचा टोला
पुणे/ प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य व केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, सगळं काही सुरू करा. आमचा अंत पाहू नका, आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका. कधी काय उघडणार याचे शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावे. रामभरोसे थांबवावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुले कोविडचा परिणाम आहे का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अशा परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार? दुकाने कधी उघडणार? एसटी बस कधी सुरू होणार? राज्यात महापुराचे संकट येऊ घातले आहे, कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे, असे असताना ९५ टक्के लोकांना वेठीला का धरता? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणे चुकीचे आहे. कोविडमुळे पास झाला, असे व्हायला नको. यावर्षी नाही, पुढच्यावर्षी परीक्षा घ्या, पण घ्या, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे.