- सरकारला माघार घ्यावीच लागेल! - भारतीय किसान सभेचा मोदी सरकारला इशारा अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी कृषी विषयक विधेयके बहुमताच्या जोरावर केंद्र ...
- सरकारला माघार घ्यावीच लागेल!
- भारतीय किसान सभेचा मोदी सरकारला इशारा
अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी
कृषी विषयक विधेयके बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर केली आहेत. बहुमताच्या जोरावर आज केंद्र सरकारचा विजय झालेला असला तरी शेतकर्यांचा पराजय झाला आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात येत्या 25 तारखेला देशभर आंदोलन सुरू होईल. त्यानंतर सरकारला माघार घ्यावीच लागेल, असे किसान सभेचे सरचिटणिस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे. सरकारला शेतकर्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी पूर्ण ताकदीने संघर्ष केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
विरोधकांचा विरोध डावलून कृषि विषयक विधेयके लोकसभेनंतर रविवारी राज्यसभेतही मंजूर करण्यात आली आहेत. त्यावरून मात्र आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 25 तारखेला किसान संघर्ष समन्वय समितीच्या अंतर्गत येणार्या 208 संघटना या विधेयकाच्या विरोधात देशभर आंदोलन करतील, असा इशाराच डॉ.नवले यांनी दिला आहे. ते म्हणाले, बहुमताच्या जोरावर शेतकर्यांना हमी भाव नाकारणारे, बाजार समित्या उद्धवस्त करणारे, सरकारची जबाबदारी कमी करणारे, शेती आणि शेतकर्यांना कॉपोरेट घराणे, कंपन्या, दलाल यांच्या दावणीला बांधणारे कृषी विधेयके केंद्र सरकारने मंजूर करून घेतले आहेत. त्याचे कायद्यामध्येही रुपांतरण केले जाईल. मात्र, या सगळ्या कायद्यांना देशभर शेतकर्यांचा प्रचंड विरोध आहे. किसान संघर्ष समन्वय समिती च्या 208 संघटना या विरोधात संबंध देशभर लढत आहेत. 25 सप्टेंबरला या विधेयकांच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याची हाक संघर्ष समितीने दिली आहे. बहुमताच्या जोरावर रविवारी केंद्र सरकारचा विजय झाला असून, शेतकर्यांच्या पराजय झाला आहे. पण येत्या 25 तारखेला जे आंदोलन सुरू होईल, तेव्हा सरकारला माघार घ्यावीच लागेल, असा इशाराही कॉ. नवले यांनी दिला.
---------------