मुंबई : 'राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच 34 साखर कारखान्यांची थकहम...
मुंबई : 'राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच 34 साखर कारखान्यांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश आहे, असं सांगतानाच आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, तरीही सुडाचे राजकारण करणार नाही,' अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
'परळीच्या कारखान्याबाबत माझं वेगळं मत आहे. तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत त्यासाठी माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणं मनाला पटत नव्हतं. भले ही त्याचा कारखाना चेअरमन वेगळ्या पक्षाचा आहे तरी राजकारण करणार नाही,' असं धनंजय मुंडे म्हणाले.
'आम्ही कारखान्याला निधी दिला आहे. विकासाचे राजकारण केलं आहे. त्यांनीही आता कारखाना चालवावा. शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, असं सांगतानाच भाजपने सत्तेत असताना केवळ त्यांच्या लोकांच्या साखर कारखान्यांनाच मदत केली. आम्ही तसं करणार नाही. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यातील सर्व कारखान्यांना मदत देण्यात आली आहे. राज्य सरकारसाठी ऊस उत्पादक शेतकरी कोणत्या एक पक्षाचा नसतो. म्हणून थक हमी देण्याचा निर्णय घेतला,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका
यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. 'त्यांनी पाठपुरवठा कधी केला? कसा केला?, परदेशातून केला की मंत्री म्हणून कोणी पाठपुरवठा केला हे कोणालाही समजेल,' असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांचं नाव न घेता लगावला.
आरक्षण प्रश्नी भूमिका कायम
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही आपली भूमिका व्यक्त केली. 'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही भूमिका आधीपासून आहे. ही आमची नवी भूमिका नाही. प्रचलित आरक्षणाला धक्का लागू नये हेच आमचं मत आहे,' असंही ते म्हणाले.