'त्या' अनुभवानंतर राज्यपाल आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांनी चोळलं जखमेवर मीठ पुणे । गतवर्षी संबंध महाराष्ट्र साखर ...
'त्या' अनुभवानंतर राज्यपाल आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांनी चोळलं जखमेवर मीठ
पुणे । गतवर्षी संबंध महाराष्ट्र साखर झोपत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली.
त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. मात्र, आता त्या कटू आठवणी काढण्यात अर्थ नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
याशिवाय महाराष्ट्राला आता भाजपची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांनी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचा दावा केला. बरं झालं ते पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल, असे बोलले. निवडणुकीआधी होईल, असे बोलले नाहीत. मात्र, आता राज्याला भाजपची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. (Devendra Fadnavis and Ajit Pawar wee hours oath taking ceremony)