पाटणाः बिहारमध्ये निवडणुका होऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले आहे; मात्र पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहे...
पाटणाः बिहारमध्ये निवडणुका होऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले आहे; मात्र पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहेत. त्यातच आता नितीशकुमार यांचे सरकार त्यांच्याच पक्षातील 17 आमदार पाडू इच्छित आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने केला आहे. हे 17 आमदार भाजपवर नाराज असून, राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षात दाखल होतील, असे या नेत्याने म्हटले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा दावा केला आहे. संयुक्त जनता दलाचे 17 आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि लवकरच राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. संयुक्त जनता दलाचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपमुळे नाराज असल्यानेच हे 17 आमदार राष्ट्रीय जनता दलात येण्यास इच्छुक आहेत; पण त्यांना तूर्तास थांबण्यात आले आहे, असे रजक यांनी म्हटले आहे. संयुक्त जनता दलाचे हे 17 आमदार राष्ट्रीय जनता दलात येण्यास तयार आहेत. त्यांना आताच पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे संयुक्त जनता दलाचे 25 ते 26 आमदार एकाच वेळी राष्ट्रीय जनता दलात आले, तर त्यांचे सदस्यत्व कायम राहील, असेही रजक म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपने बिहारमध्ये सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलाचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. त्यामुळे संयुक्त जनता दलात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नितीशकुमार यांनीही ही नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच 17 आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.
नितीशकुमार यांच्यासमोर अडचणी वाढत आहेत. ज्या प्रकारे भाजपने अरुणाचलमध्ये संयुक्त जनता दलाचे सहा आमदार फोडले त्यावरून स्पष्ट दिसत आहे, की कशा प्रकारे भाजप नितीशकुमार यांच्यावर मात करीत आहे. बिहारमध्ये भाजपची जी कार्यशैली आहे, त्यामुळेही आमदार त्रस्त आहेत. भाजपने आपल्यावर वर्चस्व गाजवू नये, अशी 17 आमदारांची इच्छा आहे, असे रजक यांनी सांगितले.