बीड । प्रतिनिधी बीड जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत मध्यम कुपोषित 590 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 92 आहे. बीड जिल्ह्यातील वाढते कुपोषण रोखण्यास...
बीड । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत मध्यम कुपोषित 590 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 92 आहे. बीड जिल्ह्यातील वाढते कुपोषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनामध्ये बालकांमधील कुपोषण कमी करण्यासंदर्भात अत्यंत निराशाजनक स्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर, बीड जिल्हा प्रशासनाकडून कुपोषित बालकांची खरी आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात 3 हजार 800 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्याची व्यवस्था आज स्थितीत केली जात आहे. मात्र ठेकेदारांकडून होत असलेल्या पोषण आहार वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार किती पोहोचतो, हा संशोधनाचा विषय आहे.बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रत्यय बीड जिल्ह्यात यात येत आहे. बालकामधील कुपोषणाची कारणे काहीही असोत. मात्र, एकही कुपोषित बालक असणे म्हणजे बीड जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद बाब आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्या मनीषा तोकले व बाल हक्क समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी दिली आहे. बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. सुमारे आठ लाखाहून अधिक ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात व परराज्यात जातात. परिणामी बालविवाहदेखील मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात लावून दिले जातात, हे वास्तव आहे. 2019 मध्ये बीड जिल्ह्यात 24 बालविवाह रोखल्याची नोंद गृहविभागाकडे आहे. जेवढे बालविवाह प्रशासनाच्या निदर्शनात आले, ते बालविवाह रोखले गेले. मात्र, अशी अनेक गावे आहेत, ज्या ठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन पोहोचू शकलेले नाही. या सगळ्या बाबींचा थेट परिणाम पुढे कुपोषित बालके जन्माला येण्यावर होत असल्याचे निरीक्षण मनीषा तोकले यांनी नोंदवले आहे.