औंध / वार्ताहर : औंध येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-ाण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन म...
औंध / वार्ताहर : औंध येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-ाण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.
औंध येथील सैनिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सोनाली मिठारी, सैनिक संघटनेचे अध्यक्ष जयसिंग घार्गे, उपाध्यक्ष वसंत पवार, सचिव धनाजी आमले, आलीम मोदी, राजाभाऊ देशमुख, वसंत गोसावी, चंद्रकांत पवार, संदिप इंगळे, पोपट कुंभार, संजय भोसले, गणेश चव्हाण, सावता यादव, नामदेव भोसले, बंडा पाटील, चॉंदशा काझी, संभाजी कुंभार प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, सैनिक व आपले नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे आजी माजी सैनिकांची कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. कोणत्याही क्षेत्रात शिस्त आणावयाची असेल तर सैनिकी बाणा अंमलात आणणे गरजेचे आहे. खटाव-माण तालुक्यातील सैनिकांच्या कॅन्टीनचा प्रश्न मार्गी लावला असून औंध येथील माजी सैनिकांनी सैनिक भवन उभे करून एक चांगले व्यासपीठ उभे केले आहे. यापुढे औंध भागातील सैनिकांसह 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. यावेळी सोनाली मिठारी, आलीम मोदी, राजाभाऊ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन धनाजी आमले यांनी केले तर आभार संभाजी कुंभार यांनी मानले.