नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले. शेतकर्यांच्या प्रगतीतील अडथळे आपण दूर केले आहेत, असे त्यांन...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले. शेतकर्यांच्या प्रगतीतील अडथळे आपण दूर केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी आज फिक्कीच्या 93व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केले. या वेळी ते म्हणाले, की, नव्या कायद्यांनी शेतकर्यांना पर्याय वाढणार आहेत. तसेच शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. आपण 20-20 सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिले आहे. 2020 वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोनाकाळाबाबत विचार करू, त्या वेळी आपल्यालाही विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत; मात्र चांगली गोष्ट ही आहे, की जेवढ्या वेगाने परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगाने स्थिती सुधारतदेखील आहे.
मोदी म्हणाले, की नव्या कृषी कायद्यांमुळं शेतकर्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. त्यामुळे देशात शीतगृहांची साखळी तयार होईल. त्यासाठी पायाभूत सुविधाचे जाळे तयार होईल. कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात भारताने आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले. भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जे काम केले आहे, धोरणे आखली आहेत, निर्णय घेतले आहेत, परिस्थिती सावरली आहे, हे पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.
मागील सहा वर्षात भारतीयांनी असे सरकार पाहिले, की जे फक्त आणि फक्त देशातील 130 कोटी जनतेसाठी समर्पित आहे. हे सरकार देशवासीयांना प्रत्येक ठिकाणी पुढें नेण्याचं काम करत आहे, असे ते म्हणाले. जगाचा जो विश्वास भारताने मागील सहा वर्षात जिंकला आहे, तो मागील काही महिन्यांत आणखी मजबूत झाला आहे. विदेशी गुंतवणुकीचा विक्रम भारतात केला आहे, असे मोदी म्हणाले.
आंदोलक आणखी आक्रमक
दरम्यान, दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरही तोडगा निघालेला नाही. आज आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक झाले असून जयपूर आणि आग्रा हायवे जाम करणार असल्याचा इशारा दिला आहे.