आघाडी सरकारने सोपवली जबाबदारी माण-खटावमध्ये जल्लोष औंध / वार्ताहर : दुष्काळी माण-खटाव तालुक्यातील शेती पाण्यासाठी वरदायिनी असलेल्या उरमोडी प...
आघाडी सरकारने सोपवली जबाबदारी माण-खटावमध्ये जल्लोष
औंध / वार्ताहर : दुष्काळी माण-खटाव तालुक्यातील शेती पाण्यासाठी वरदायिनी असलेल्या उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदी हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याचे कळताच माण-खटाव तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी शासनाने प्रलंबित पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामध्ये जे अपुरे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी तसेच काम पूर्ण झाले. अशा ठिकाणी पाणी वाटप करण्यासाठी शासनाकडून एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये 18 मार्च 2016 व 26 डिसेंबर 2019 मधील तरतुदीनुसार उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदी काँग्रेसचे माण-खटावचे नेते रणजितसिंह देशमुख यांची जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे. कायम दुष्काळी असलेल्या माण-खटावच्या पाणी प्रश्नासाठी देशमुख यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना रखडलेल्या उरमोडी प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे उरमोडी प्रकल्प पूर्ण होऊन पाणी माण-खटाव मध्ये आले आहे. या पूर्वीच्या सदस्यांच्या काळात पाण्याचे वाटप व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होऊ लागल्याने लक्षात घेऊन सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने कालवा समितीच्या सदस्य पदी रणजितसिंह देशमुख यांची निवड केली. त्यांच्या निवडीमुळे खटाव-माण तालुक्यातून रणजितसिंह देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
------------------------
खटाव माणचा पाणी प्रश्न सोडवण्यास कटिबध्द
उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून खटाव माण तालुक्यात पाणी गेल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. तसेच कृष्णा खोरे, जिहे-कटापूर व तारळी प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात खटाव-माणचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास आम्ही बांधील असून या रखडलेल्या प्रकल्पाचे कामे ही लवकरच पूर्ण होतील. यामुळे येथील शेतकर्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल.
रणजितसिंह देशमुख
संस्थापक - हरणाई उद्योग समुह