नागपूर : सर्वांसाठी घरे 2020 हे केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी धोरण असून या धोरणाची अंमलबजावणी म्हणून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आ...
नागपूर : सर्वांसाठी घरे 2020 हे केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी धोरण असून या धोरणाची अंमलबजावणी म्हणून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास, शबरी, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम व यशवंतराव मुक्त वसाहत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाआवास अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. महा आवास अभियान-ग्रामीण योजनेचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार आशिष जायसवाल, रणधीर सावरकर यांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग नोंदविला तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिन साजरा करण्यात येतो. 2020-21 या वर्षी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामीण आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे, समाजातील सर्व संबंधित घटकांचा सहभाग, घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे, विविध शासकीय योजनांचा कृतीसंगम घडवून आणणे या क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सादरीकरणाद्वारे महा आवास योजनेची माहिती विशद करतांना भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण, घरकुलांच्या उद्दिष्टांनुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे. कायमस्वरुपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सीडींग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग, जॉब कार्ड मॅपिंग 100 टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम, अशा दहा उपक्रमाची माहिती दिली. त्याचबरोबर नावीण्यपूर्ण उपक्रम बहुमजली इमारती उभारणे, पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारुन सहकारी संस्था स्थापन करणे, बँकेचे 70 हजार रुपये कर्ज मिळवून देणे, घरकुल बांधकाम साहित्य उपलब्ध करण्यासाठी बचत गटांच्या सहकार्याने घरकुल मार्ट सुरु करणे, पंचायत राज्य संस्थांच्या व लोक सहभागाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे आदी बाबींची माहिती देण्यात आली.