नवी दिल्ली : गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनसुखभाई वासवा यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाच्या मनमानीला कंटाळून...
नवी दिल्ली : गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनसुखभाई वासवा यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाच्या मनमानीला कंटाळून वासवा यांनी राजीनामा सोपवल्याचे समजते.
नेतृत्वाकडून आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने वासवा नाराज होते. वासवा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहून आपली नाराजीही कळवली होती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण लोकसभेचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मनसुखभाई चर्चेत आले होते. राज्यात आदिवासी महिलांच्या तस्करीचा मुद्दा त्यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासमोर मांडला होता. तसेच स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या मुद्यावरही वासवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी ’स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या जवळपासचा इको-सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. ही मागणी या भागात राहणार्या आदिवासींकडून केली जात होती. वासवादेखील याच वर्गाशी संबंधित आहेत; परंतु पक्षाने मात्र वासवा यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे कंटाळून शेवटी वासवा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
भाजपच्या अनेक बड्या नेत्यांपैंकी एक म्हणून मनसुखभाई ओळखले जातात. त्यांनी तब्बल सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून जबाबदारी हाताळली; परंतु गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या मनमानी कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.