नवी दिल्लीः भारतातही ब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू पोहोचला आहे. नव्या कोरोनाचे सहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांच्या काळजात धस्स झाले...
नवी दिल्लीः भारतातही ब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू पोहोचला आहे. नव्या कोरोनाचे सहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे. नव्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली. भारतात ब्रिटनपेक्षाही घातक असा कोरोना तयार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने नव्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विषाणूबाबत अधिक माहिती घेऊन त्यावर नियंत्रणासाठी आणि उपचारासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. नव्या कोरोना विषाणूसबाबत केंद्र सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यात प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन, निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गवा सहभागी झाले होते.
विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी आठ बदल खूप महत्त्वाचे आहेत. विषाणू ज्या रिसेप्टरने मानवी पेशीशी सोडला जातो, तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे. त्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो. नव्या कोरोनाच्या पसरण्याचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे.
आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, की ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत 40 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत आणि ही इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. कोरोनाच्या इतर रूपापेक्षा हा व्हायरस वेगाने पसरतो आहे.
या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस. कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लसी ब्रिटन आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. विषाणूच्या बदलामुळे लसीच्या प्रभावावर काहीही परिणाम होणार नाही; पण त्याला थोडा वेळ लागेल. आपल्याला संयम राखावा लागेल. यावर उपचारासाठी योग्य त्या थेरेपीचा वापर करायला हवा. नाहीतर हा विषाणू आवाक्याबाहेर जाईल, असे आयसीएमआरचे बलरामा भार्गवा यांनी सांगितले. सुरुवातीलाच या विषाणूवर नियंत्रण मिळवणे सोपे आहे. कदाचित भारतातही अधिक जीवघेण्या कोरोनाचे रूप येऊ शकतो. जो यापेक्षा जास्त घातक असेल, असे सांगत निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सावध केले आहे.