अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. नगर अर्बन बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गांधी यां...
अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. नगर अर्बन बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
दिलीप गांधी हे तीन वेळा भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील राहिले आहेत. गांधी यांच्यावर नगर अर्बन बँकेत पैशांचा अपहार केल्याप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दिलीप गांधी हे 2014 ते 2019 मध्ये नगर अर्बन बँकेचे चेअरमन होते. दिनांक 7 -10-2017 ते 10-11-2017 या दरम्यान गांधी आणि काही संचालकांनी मिळून कट रचून, संगनमत करुन, बँकेचे खोटी कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बँकेच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार आणि सभासद यांचा विश्वासघात केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. ही रक्कम आर. बी. कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराज एटरप्राइजेस संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करून, त्यांच्या खात्याद्वारे काढून घेतली. आरोपींनी अपहार केलेली रक्कम तब्बल तीन कोटी एवढी आहे. आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव 13 खोटी कर्ज प्रकरणे मंजूर केली. यात तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दिलीप गांधी यांच्यासह घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे आणि बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 406 , 420 , 465 , 467 , 471 , व 120 ब या कायदयाअंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आलीये. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यासाठी काही माजी संचलकांनी आंदोलन केले होते. त्यानुसार बँकेकडून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, दिलीप गांधी यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेय. यंदा पक्षाने तिकीट कापल्याने गांधी नाराज होते. त्यामुळे त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द देखील देण्यात आला होता. मात्र आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या समोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहे.