अहमदनगर: दिल्लीतील शेतकर्यांचे आंदोलन तीव्र होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतक...
अहमदनगर: दिल्लीतील शेतकर्यांचे आंदोलन तीव्र होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकर्यांचे आंदोलन नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आहे, तर हजारे यांनी मागील आंदोलन स्थगित करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू, असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविले आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी सक्रिय सहभाग घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. पूर्वी आपल्याला सरकारने दिलेल्या आश्वसनांचे पुढे काहीच झाले नाही, असे सांगत वेळ पडल्यास आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यावशीच हजारे यांनी दिला होता. त्यानंतर आज हजारे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पूर्वीच्या आंदोलनात केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारने दिलेली आश्वासने यांचाच उल्लेख केला आहे. त्यामुळे हजारे यांचे आंदोलन झालेच तर ते दिल्लीतील शेतकर्यांच्या मुद्द्यांपेक्षा वेगळ्या मुद्द्यांवर असेल.
कृषिमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, की पाच फेब्रुवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे तत्कालीन कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन अन्य मंत्र्यांसोबत शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून कृषी मालाचा उत्पादन खर्च व किमती ठरविणे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. या सर्व मुद्द्यांवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात येईल. ही समिती 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत अहवाल सादर करील आणि सरकार त्यावर पुढील कार्यवाही करील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. त्यामुळे उपोषण मागे घेतले होते; मात्र आतापर्यंत त्यावर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे त्या दिवशी स्थगित करण्यात आलेले उपोषण आता पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. या पत्रात नव्या कृषी कायद्यांसंबधी हजारे यांनी कोणताही उल्लेख केला नाही अगर विरोध किंवा पाठिंब्याची भूमिकाही जाहीर केलेली नाही.
हजारे यांच्या मागण्या
ःःःःःःःःःः.
*कृषिमूल्य आयोगाला स्वायतत्ता द्या.
* स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
* कृषी मालाचा उत्पादन खर्च व किमती ठरवा.
*फळे, भाज्या आणि दुधाला किमान आधारभूत किमत ठरवून द्या.
*शेतकर्यांना कर्जमुक्त करा.
*आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरवा
*आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवा व त्यासाठी अनुदान द्या.