मुंबई / प्रतिनिधी: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आ...
मुंबई / प्रतिनिधी: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. मराठा आंदोलकांची मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा शहरांतून आंदोलक मुंबईत येऊ नयेत, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती रस्तच्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. तसेच मुंबईच्या वेशींवरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
मुंबईबाहेरून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी वाशी आणि मानखुर्द दरम्यान नाकाबंदी केलेली आहे. संशयित गाड्यांची पोलिस तपासणी करत आहेत. तसेच मुलूंड टोलनाक्यावरही पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. अशातच कोल्हापुरातील मराठा समाजाचे काही आंदोलक मुंबईच्या वेशीवर पोहचले, तर काही आंदोलक गनिमी कावा करून मुंबईत रात्रीच पोहचले आहेत. मराठा आरक्षाणाचा प्रश्न निकाली लागत नसल्याने मराठा आंदोलकांनी आता मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोहोचू लागले आहेत. या आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या प्रवेशद्वारावर अडवण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. कळंबोली, वाशी, मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. ज्या गाड्यांमध्ये मराठा आंदोलक भेटतील, त्यांना ताब्यात घेवून गावाकडे पाठवले जात आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देत राज्य सरकारला पुन्हा दणका दिला आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली होती.
पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली होती. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे..