नाशिक प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी पंजाब आण...
नाशिक प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील लाखो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन पाठींबा जाहीर करण्यात आला असून तालुका व शहरातील शेतकरी, व्यापारी कामगारांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.
केंद्र सरकारने कृषी विषयक काढलेल्या अध्यादेशाबाबत शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे जर शेतकरी हिताचे नसतील तर अशा कायद्यांचा उपयोग काय ? त्यामुळे ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेले हे कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे. या कायद्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा विरोध असून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदमध्येही जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील शेतकरी, व्यापारी, कामगार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.