मुंबई/ प्रतिनिधी: मुंबईच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनस या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून...
मुंबई/ प्रतिनिधी: मुंबईच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनस या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून या स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव दिले जाणार आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीत आता आता केंद्र सरकारने लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, यासंबंधीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली. केंद्रीय उपराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सावंत यांना एका पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता’, असे सावंत यांनी निदर्शनास आणले.
आता जी आद्य आणि प्रगत मुंबई दिसत आहे, तिचा पाया रचणारे खुद्द शंकरशेठ आहेत. त्यांनी स्वत:चा बंगला सध्याच्या मध्य रेल्वेच्या कार्यालयाला दिला होता. स्वत:ची जमीनही त्यांनी यासाठी दिली होती. इंग्रजांना सोबतीने घेत त्यांनी दक्षिण मुंबईचा विकास घडवला. या योगदानासाठी नाना शंकरशेठ यांचे उचित स्मारक होणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साततत्याने मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता, असे सांगून आपणही लोकसभेत या मागणीला उचलून धरत पत्रव्यवहार सुरू ठेवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर नुकतेच मिळाले. या पत्रात नामांतराची प्रक्रिया सुरू झाली असून, हे बदल लवकरच होणार असल्याचे नमूद केल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.