अहमदनगर/प्रतिनिधी: कर्जत-जामखेडचे आमदार यांनी आता वेगळ्या अर्थाने स्वत:ला ‘सामाजिक गुंड’ म्हणविले आहे. याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे प्रति...
अहमदनगर/प्रतिनिधी: कर्जत-जामखेडचे आमदार यांनी आता वेगळ्या अर्थाने स्वत:ला ‘सामाजिक गुंड’ म्हणविले आहे. याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी प्रा. मंत्री राम शिंदे यांनी पवार यांना टोला लगावला आहे. मतदारसंघात मागील दीड वर्षांत जे काही घडत आहे, त्यावरून ‘ते सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे,’ असे प्रा. शिंदे म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात या निवडणुकीला पवार विरुद्ध शिंदे असे स्वरूप आले आहे. हे दोघेही प्रचारात सक्रिय झाले असून आरोपप्रात्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी बिनविरोध होणार्या ग्रामपंचायतीला 30 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. याला विरोध करताना शिंदे यांनी हे तर मतदारांना प्रलोभन असून अशा घोषणा करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. खर्डा येथे प्रचाराचा प्रारंभ करताना पवार यांनी शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, की निवडणुका बिनविरोध करण्याचा माझा मूळ विचार विरोधकांना पटलाच नाही. गावात गटबाजी नको, लोकांनी एकत्र येऊन विकासाला चालना द्यावी, असा माझा विचार होता; मात्र ज्यांचे राजकारण गटबाजी करून पोळी भाजण्याचे आहे, त्यांना हे समजणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात सामान्यांचा आवाज दडपून टाकून निवडणुका घेण्याची पद्धत पडली आहे. आता हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ’सामाजिक गुंड’ कोणी नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ द्याव्यात, त्यातच सर्वांचे भले आहे,’ असेही पवार यांनी सुनावले. भाजपच्या प्रचार सभेत बोलताना प्रा. शिंदे यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, की हा मतदासंघ गेल्या 25 ते 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत भुलभुलैय्या केला गेला. आता लोक त्याला बळी पडणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मागील एक दीड वर्षात या मतदारसंघात जे काही सुरू आहे, त्यावरून ते ’समाज गुंड’ आहेत की ’गुंड’ हे लोकांच्या चांगलेच लक्षात आले आहे.