नाशिक / प्रतिनिधी : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली असली, तरी सााहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना बोलवायचे...
नाशिक / प्रतिनिधी : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली असली, तरी सााहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना बोलवायचे, की नाही, यावरून आता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले आणि संमेलनाच्या आयोजक संस्थेचे प्रमुख हेमंत टकले यांच्यात वाद सुरू झाला आहे.
26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे. हे संमेलन आगळे वेगळे कसे होईल, यासाठी लोकहितवादी मंडळ प्रयत्नशील आहे. यासोबतच नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळावा भरवत या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सहस्त्रचंद्रदर्शनाची खास भेट देण्याचा लोकहितवादी मंडळाचा मानस आहे; परंतु त्यालाच ठाले पाटील यांचा विरोध आहे. सहस्त्रचंद्रदर्शन वगैरे चर्चा आहे; मात्र तसा प्रस्ताव आल्यास आम्ही परवानगी देणार नाही. तसेच ज्यांचा काही रोल नाही, अशा राजकीय लोकांना व्यासपीठावर घेतले जाणार नाही. उद्घाटक पण राजकीय व्यक्ती नसतील. लेखक किंवा लेखिकाच असतील, असे त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे संमेलनाचे सर्व नियोजन सुरू असतानाच दुसरीकडे ठाले पाटलांच्या या वक्तव्यामुळे संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळाची मोठी अडचण झाली आहे. या मंडळाचे विश्वस्त आणि नाशकात होणार्या संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच आता सरकारही महाविकास आघाडीचे असल्याने टकले यांनी पत्रकार परिषद बोलवत राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर बोलवावेच लागेल असे स्पष्ट केलेे. कुठल्याही राजकीय व्यक्तीला आम्ही बोलावणार नाही, असे ठाले पाटील जरी म्हणत असले, तरी संमेलनाला शासनाकडून अनुदान मिळते. इतर मदत मिळते. त्यामुळे आम्हाला मंत्री नेते यांना बोलवावेच लागेल, साहित्य महामंडळाने आखून दिलेली सगळी चौकट आम्ही पाळू, असे टकले म्हणाले.
ठाले पाटलांचा पोटशूळ आताच का?
नेहमीप्रमाणे यंदाही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वादाची ठिणगी पडली आहे. स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, स्वागत समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली गेली. तसेच संमेलनासाठी स्थापन होणार्या विविध 39 समित्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वास ठाकुर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे माहीत असताना त्यावर ठाले पाटील काहीच बोलले नाहीत.