शरद पवार यांच्या सूचनांची अंमलबाजवणी करणार मुंबई / प्रतिनिधीः कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलतेची विपुलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणार्या ...
शरद पवार यांच्या सूचनांची अंमलबाजवणी करणार
मुंबई / प्रतिनिधीः कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलतेची विपुलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणार्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवार यांनी आज केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच ती सूचना मान्य करून त्यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, अजित पवार यांनी राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही दिली. कोकण विभागास (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे) आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात मुंबईतील राज्य सह्याद्री अतिथीगृहात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. डॉ. काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेत तेथील निसर्गाला हानी न पोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील 50-100 वर्षांचा विचार करून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा र्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा अजित पवार यांनी व्यक्त केला.
ठाकरे यांनी ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे राजकीय बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहिजे. त्यासाठी राज्याचे धोरण आवश्यक असल्याची सूचना केली.
कोकणाचा फायदा
* इनोव्हेटीव्ह रिजन अंतर्गत रायगड, रत्नागिरी, सिंधुर्दु्ग जिल्ह्यांचा समावेश
* विकासाची अमर्याद संधी
*साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरणपूरक उद्योगांचा विकास
*पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास
*उद्योग, विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती
*नागरिकांच्या जीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय