मुंबई/प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढ...
मुंबई/प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा, नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. दरेकर यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत; पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल, तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल, त्यांची ताकद संपली असेल असे सरकारला वाटत असावे. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचे राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.