ऍड. अभिजित वीर यांची माहिती; जिल्हाधिकारी यांचा निकाल औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे ग...
ऍड. अभिजित वीर यांची माहिती; जिल्हाधिकारी यांचा निकाल
औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वेळेत निवडणूक खर्च सादर न करणे आणि कागदपत्रे सादर केल्याने माजी उपसरपंच सुरेश उर्फ सुर्यकांत शंकरराव कदम यांचेसह दोघांना पुढील पाच वर्षासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी निर्बंध घातल्याची माहिती ऍड. अभिजित वीर यांनी औंध येथे पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत ऍड. वीर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरेश शंकरराव कदम यांच्यासह सचिन उत्तम कदम, मंगल अर्जुन कदम हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. सुरेश कदम हे उपसरपंच म्हणून कारभार पहात होते. मात्र, निवडणूकीनंतर निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीच्या खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात वेळेत निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक असते. वरील तिघांनी वेळेत खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला सादर केला नसल्याने त्यांच्या विरोधात श्रीकांत कदम आणि रवींद्र कदम यांनी ऍड. अभिजित वीर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. ऍड. वीर यांनी केलेला युक्तिवाद जिल्हाधिकारी यांनी मान्य करून वरील तिघांना पाच वर्षे निवडणूक लढवण्यास निर्बंध घातले आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा निकाल आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी दादासो कदम, नितीन वीर उपस्थित होते.