नवी दिल्ली: पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. इतरांना दे...
नवी दिल्ली: पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणार्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी अर्णब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सोनिया यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या वेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांत आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळले जाते, हे आपण पाहिले आहे. जे लोक दुसर्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देत होते, त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसांत गोपनीय माहिती उघड होत आहे, ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगले आहे, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या वेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झालेली दिसते आहे, असा टोला सोनिया यांनी लगावला आहे. शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने अहंकार आणि संवेदनाहिनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने कृषी कायदे घाईघाईत मंजूर केले. हे कायदे समजून घेण्यासाठी विरोधकांना संधीच दिली नाही आणि आता शेतकर्यांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसने सुरुवातीलाच हे तीनही कायदे फेटाळून लावले होते. या कायद्यातून किमान हमी भावापासून ते अन्न सुरक्षेपर्यंतचे प्रश्न उपस्थित होत आहेत, असे त्या म्हणाल्या.