शिराळा / प्रतिनिधी : शिराळा येथील स्वाती भस्मे या तरूणीने दिव्यांग असूनही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई नुकतेच सर केले. सामान्य कुट...
शिराळा / प्रतिनिधी : शिराळा येथील स्वाती भस्मे या तरूणीने दिव्यांग असूनही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई नुकतेच सर केले. सामान्य कुटुंबातील या तरुणीच्या या असामान्य कामगिरीने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हे शिखर सर करणारी स्वाती शिराळा तालुक्यातील पहिली महिला आहे. औरंगाबाद येथील शिवऊर्जा प्रतिष्ठानने दिव्यांगांसाठी कळसुबाई शिखर सर करणारी मोहीम राबवली होती. राज्यातील 70 तर सांगली जिल्ह्यातील 11 दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले. शिराळा तालुक्यातील स्वाती ही एकमेव व्यक्ती आहे. हीने हे शिखर सर केले आहे.
स्वाती लहानपणापासूनच अस्थिव्यंग आहे. तरीसुध्दा तिने 18 व्या राष्ट्रीय पॅराऍथलेटिक स्पर्धेत गोळा फेक आणि थाळीफेक या क्रीडा प्रकारात दोन कास्य पदके पटकावली आहेत. शिवाय देशातील पहिल्या अपंग महिला क्रिकेट संघात तिचा समावेश होता. विश्वासराव नाईक महाविद्यालयातून तीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिव्यांग असलेली स्वाती 28 वर्षांची असून, तिचे वडील बाळासाहेब भस्मे हे ट्रक चालक आहेत. आई गृहिणी आहे. दोन विवाहित बहिणी असून एक लहान भाऊ आहे. तिच्या या कार्याबद्दल कुटुंबाचा सतत पाठिंबा असतो. कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य असतानाही ती परिस्थितीवर मात करत सतत यशाला गवसणी घालत असते.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची महासंचालक म्हणून तीने अकरा वर्षे काम केले आहे. स्वत: संघर्ष करताना आपल्या सारख्या इतर दिव्यांगांना तीने मदतीचा आधार दिला आहे. 2000 पेक्षा अधिक दिव्यांगांना शासकीय मदत मिळवून दिली आहे. घरकुल मंजूर करून देणे, अपंगत्वाचा दाखला काढून देणे, कर्ज मिळवून देणे किंवा पेन्शन मिळवून देणे. यासाठी ती स्वत: सांगलीला हेलपाटे घालते.
संपूर्ण तालुक्यातून लोक तिच्याकडे मदतीसाठी येतात. दिव्यांगासाठी तिला येत्या काळात संस्था उभारायची आहे. येथे सर्व प्रकारच्या दिव्यांगांना कायमचा आधार मिळेल असे ती आवर्जून सांगते. समाजात दिव्यांगांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यांना दररोज जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी एक चांगली संस्था स्थापन करण्याचा विचार केला असल्याचे तीने सांगितले. एकाग्रता, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि सतत नवे शिकण्याची इच्छा ही स्वातीची बलस्थाने आहेत. ती म्हणते, आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्या यशाची स्वप्ने बघितल्याने आज मला कळसुबाई शिखर सर करता आले.