मुंबई/प्रतिनिधी : ऑनलाईन फसवणुकीमुळे रोज लाखो मुंबईकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. एखाद्याची ऑनलाईन फसवणूक झाली आणि त्याचे पैसे परत मि...
मुंबई/प्रतिनिधी : ऑनलाईन फसवणुकीमुळे रोज लाखो मुंबईकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. एखाद्याची ऑनलाईन फसवणूक झाली आणि त्याचे पैसे परत मिळाले, असे फारच क्वचित होते. असा चमत्कार मुंबई पोलिसांनी करून दाखविला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने व्यापार्याचे 12 लाख रुपये परत मिळवून दिले. मुंबई राहणारे मनोज शहा हे मुंबईतील मोठे स्टील व्यापारी आहेत. 25 जानेवारी रोजी दुपारी शहा यांच्या खात्यातून 12 लाख 70 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला होता; पण शहा यांनी ते पैसे काढले नव्हते किंवा त्यांनी कोणाला चेकही दिला नव्हता.
शहा यांनी तत्काळ बँकेत फोन केला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाली होती; पण आता काय करायचे, हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. खरे तर ऑनलाईन फसवणूक झाल्यावर पैसे परत मिळत नाही; पण शहा यांना मात्र त्यांचे पैसे परत मिळाले. खरी तर ही कमाल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची आहे. शहा यांच्या खात्यातून पैसे ऑनलाईन काढून घेण्यात आले होते. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मुंबई सायबर सेल पोलिसांशी संपर्क केला. मनोज यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याप्रकरणाची दखल घेऊन सूत्रे हलवली. त्यानंतर पोलिसांनी शहा यांचे पैसे परत मिळवून दिले. मुंबई सायबर सेलमुळे शहा यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. शहा यांनी हुशारी दाखवत तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. अशीच हुशारी जर सर्वांनी दाखवली तर अशी फसवणूक टाळता येईल, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईला जेवढे नुकसान दहशतवादी हल्ल्यांतून झाले नसेल, त्याच्या कित्येक पटीने जास्त या अशा सायबर हल्ल्याने मुंबईचे नुकसान झाले आहे. अजूनही होत आहे. अशा सायबर हल्ल्यापासून सायबर पोलिस काही प्रमाणात सरंक्षण करू शकतात. त्याचबरोबर अशा ऑनलाईन होणार्या आर्थिक हल्ल्यापासून स्वतःच स्वतःचे संरक्षण करता येते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.