मुंबई/प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घ...
मुंबई/प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यासाठी बैठका झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालये सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत, असे सांगून सामंत म्हणाले, की 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालये सुरू केली जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते; मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये आम्ही महाविद्यालये सुरू करीत आहोत. महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असेही त्यांनी सांगितले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही, त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असे सामंत यांनी सांगितले.