सोमवारपासून विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी 85 बस सेवेत कराड / प्रतिनिधी ः कोरोनाच्या महामारीनंतर ग्रामीण व शहरांना जोडणार्या बसची स...
सोमवारपासून विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी 85 बस सेवेत
कराड / प्रतिनिधी ः कोरोनाच्या महामारीनंतर ग्रामीण व शहरांना जोडणार्या बसची सेवा कराड बसस्थानकातून सोमवारपासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 8 पासून कराड बसस्थानकातून 154 फेर्या वाढणार असून 85 एसटी बस आगारातून मार्गावर धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
कराड येथील बस आगारात आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बिस्मिल्ला सय्यद, वाहतूक निरीक्षक वैभव साळुंखे, वरिष्ठ लिपिक सचिन महाडिक, वाहतूक नियंत्रक मन्सूर सुतार, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
आगारप्रमुख विजय मोरे म्हणाले, शाळा-महाविद्यालये सुरू झाले असून विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी सोमवारपासून बसफेर्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वडोली निळेश्वर-धानाई, वडगांव-घोणशी प्रत्येक तासाला तर काले-मसूर प्रत्येक अर्धा तासाने सुरू केली जाईल. मसूर येथून किवळ, निगडी सकाळी 8 ते 5 पूर्वीप्रमाणे सुरू होईल. मुजळवाडी, रेठरे बु।, गलमेवाडी, कासारशिरंबे, कालगांव या मुक्कामी बसेस सुरू होतील. तसेच बहुले, धवडवाडी ही बस सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पासेसची सोय करण्यात आली असून त्यांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज व उंडाळे येथेही विद्यार्थ्यांना पास देण्याची सोय केली आहे. सध्या 482 बसफेर्या चालू आहेत.
पुढे बोलताना मोरे म्हणाले, मुंबईत लोकल बंद असल्याने कराड आगाराच्या जवळपास शंभर गाड्या मुंबई बेस्टला वापरण्यासाठी दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला जस-जशा गाड्या परत मिळतील तसतशा आपण कराड आगाराला गाड्या वाढवणार आहोत. आता सध्या कराड आगाराकडे 85 गाड्या असून त्या सर्व गाड्या सुरू आहेत. रस्त्यात गाड्या बंद पडण्याचे प्रमाण हळूहळू कमी येईल.
संघटनेचा हस्तक्षेप टाळणार
कराड आगारात संघटनेचा कोणताही हस्तक्षेप विचारात घेतला जाणार नाही. कोणत्याही संघटनेची कामात ढवळा-ढवळ चालू दिली जाणार नाही. कर्मचार्यावर कोणताही अन्याय होवू दिला जाणार नाही. कर्मचार्यानी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्याच्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे अधिकारी पदाचा तसेच अधिकारांचा गैरवापर करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणावर अन्याय होवू नये यांची काळजी घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी सांगितले.