मुंबई : वंदनीय छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्ताने राजधानी किल्ले रायगड 18 व 19 फेब्रुवारी रोजी शिवभक्तांसाठी 48 तास खुला राहणार...
मुंबई : वंदनीय छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्ताने राजधानी किल्ले रायगड 18 व 19 फेब्रुवारी रोजी शिवभक्तांसाठी 48 तास खुला राहणार आहे. यासाठी शिवभक्तांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी रायगड किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगडवर ज्योत नेण्यासाठी तसेच शिवरायांच्या दर्शनासाठी येणार्या शिवभक्तांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता त्यांना प्रवेश मिळावा, तसेच 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस 48 तास पूर्णवेळ रायगड सुरू रहावा, अशी मागणी डॉ. शिंदे यांनी सांस्कृतिक तथा पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल व केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीला बुधवारी सायंकाळी सहा वाजता मान्यता देण्यात आली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. अरविंद मंजुळ यांनी ही मान्यता दिली आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक राजेंद्र यादव यांना मागणीचे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून स्वीय सहायक मंगेश चिवटे यांनी मंगळवारी दिले होते. या मागणीला 24 तासांतच परवानगी मिळाली. रायगड नेहमी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू असतो. त्यामुळे शिवजयंतीला येणार्या शिवभक्तांना रायगड सर करणे अडचणीचे ठरत होते. आणि जयंतीला कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, या मागणीला आज मूर्त स्वरूप आले. या निर्णयाचे शिवभक्तांनी स्वागत केले आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले.