माण तालुक्यातील 6 गावच्या शेतकर्यांचा इशारा म्हसवड / वार्ताहर : अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना ...
माण तालुक्यातील 6 गावच्या शेतकर्यांचा इशारा
म्हसवड / वार्ताहर : अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये भत्ता तातडीने मिळावा. अन्यथा गुरूवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी म्हसवड येथे सहा गावच्या शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत माणच्या तहसीलदार सौ. बी. एस. माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, काळचौडी आम्ही सहा गावचे पंचक्रोशीतील समस्त शेतकरी विनंती अर्ज करतो की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पंचक्रोशीतील शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर पंचनामेही करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही परिसरातील कोणत्याच शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याबरोबरच शेतकर्यांनी भरलेला पिक विमा मिळाला नाही. आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन पर भत्ता 50 हजार देण्याचे शासनाने जाहीर केले असताना आजपर्यंत पैसे जमा झाले नाहीत.
मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करावयाचे आहे. तत्पूर्वी वरीलप्रमाणे सर्व मागण्यांचा जाणीव पुर्वक विचार करुन लवकरात लवकर वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील सर्व शेतकर्यांच्या खात्यावर,नुकसान भरपाई, पिकविमा आणि प्रोत्साहनपर भत्त्याची रक्कम जमा करावी. अन्यथा नाईलाजास्तव गुरुवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी पंचक्रोशीतील समस्त शेतकर्यांच्या वतीने म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर सकाळी 10 वाजता रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.