नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्वीटरने 500 अकाऊंट्स कायमची बंद केली आहेत. ट्विटरने याबाबत बुधवारी माहिती द...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्वीटरने 500 अकाऊंट्स कायमची बंद केली आहेत. ट्विटरने याबाबत बुधवारी माहिती दिली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली आहे. तसेच वादग्रस्त हॅशटॅगवरही कारवाई करण्यात आली आहे.
ट्विटरला भारत सरकारने 1178 अकाऊंट्स बंद करण्यास सांगितले होते. या अकाऊंट्समागे खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तानचा हात असल्याचे सरकारनं म्हटलं होतं. यासोबतच सरकारने म्हटले होते की ही अकाऊंट्स शेतकरी चळवळीच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवतात आणि भडकाऊ पोस्ट करत आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर ट्विटरने आज एक निवेदन जारी केले की, यातील काही अकाऊंट्स त्यांना बंद केली गेली आहेत. ट्विटरने 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दलही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर असे म्हटले होते की 26 जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचारानंतर नियमांचे उल्लंघन करणारी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारा मजकूर काढून टाकण्यात आला आहे. यासह 500 अकाऊंट्स कायमचे बंद करण्यात आले आहेत, असे ट्विटरने सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारने #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश ट्विटरला दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला होता. या संदर्भात सरकारने नोटिस देखील बजावली होती. 30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन करण्यात न आल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली. सरकारच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असून तसे न केल्यास कडक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.