इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सर...
इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने लग्न समारंभ व मंगल कार्यांसाठी 50 लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोरपालन मंगल कार्यालये व कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंगचे पालन करून लग्न समारंभ, मंगल कार्य करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगल कार्यालय मालक, केटरींग असोसिएशन यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्देशांचे पालन करण्याच्या अटींवर मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी दिली आहे. लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचे उल्लंघन तसेच कोविड-19 च्या बाबत घ्यावयाची खबरदारी यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासणी पथक गठीत करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोविड-19 चा पुन्हा सुरू होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंगल कार्यालये धारकांनी सहकार्य करावे.