संगमनेर/प्रतिनिधी : कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस...
संगमनेर/प्रतिनिधी : कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणार्या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणार्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या एकूण भूमिकेची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या शिर्डीतील प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घ्यावा यासाठी आज संगमनेरातील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावून साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकार्यांचा निषेधही नोंदविला.
16 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील सर्व देवालये भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र कोविडचे संकट लक्षात घेवून त्यासाठी नियमावलीही जाहीर केली. तब्बल आठ महिन्यांच्या विलंबानंतर मंदिरं उघडल्याने कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत मोठी गर्दी होणार हे निश्चित असल्याने विविध वृत्तवाहिन्यांचे व मुद्रित माध्यमाचे प्रतिनिधी मंदिरे उघडली त्या दिवशी शिर्डीत वार्तांकन करीत होते. त्याप्रमाणे इॅलेक्ट्रानिक वृत्तवाहिनीचे मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा हे दोघेही आपल्या कॅमेरामनसोबत मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थानाजवळ साईंचे दर्शन घेवून बाहेर पडणार्या भाविकांच्या प्रतिक्रिया घेत होते. याच दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे तेथे आले व त्यांनी कोणतीही विचारपूस न करता माध्यमांच्या प्रतिनिधींवर आगपाखड केली. यासर्व घटनांचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन करुन एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा सुरु असलेला मनमानी कारभार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे पित्त खवळलेल्या बगाटे यांनी पूर्वग्रह दुषीत मनाने त्यांच्या गैरकारभाराला विरोध करणार्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच घाव घालून माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठी तब्बल अडिच महिन्यानंतर या वृत्तवाहिनीच्या दोघा पत्रकारांसह त्यांच्या कॅमेरामनवर सूड भावनेतून रविवारी शिर्डी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.द.वी.कलम 353, 188, 34 प्रमाणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची ही भूमिका हिटलरवादी असून माध्यमांची मुस्कटदाबी करणारी आहे. संगमनेर पत्रकार मंचच्यावतीनेही आज उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना निषेधाचे निवेदन देत मु‘यमंत्री महोदयांकडे वरीलप्रमाणे मागणी केली आहे. संगमनेरातील पत्रकारांनी दिवसभर काळ्याफिती लावून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा निषेधही नोंदविला. याप्रसंगी संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, सचिव गोरक्षनाथ मदने, सदस्य आनंद गायकवाड, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, अंकुश बुब, अमोल मतकर, राजू नरवडे, सतीश आहेर, सोमनाथ काळे, निलिमा घाडगे, भारत रेघाटे, बाबासाहेब कडू, सुनील महाले, संजय साबळे, काशिनाथ गोसावी व सुशांत पावसे आदी पत्रकार उपस्थित होते.
चौकट..
सूड भावनेने पत्रकारांवर कारवाई
वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात ठेवून बगाटे यांनी रविवारी 31 रोजी तब्बल अडिच महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात तिघा पत्रकारांवर गुन्हे दाखल केले, यातूनच त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो. बगाटे यांची ही कृती माध्यमांची मुस्कटदाबी करणारी असल्याने त्यांचे निलंबन करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे.