मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा याचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्...
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा याचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नवलखाचा जामीन नाकारताना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासारखे कारण नाही, असे स्पष्ट केले.
आपल्याला नजरकैद करण्यात आले असून गेल्या 90 दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा असा अर्ज गौतम नवलखाने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला होता. परंतु, सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर याप्रकरणी त्याने मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले. त्याच्या अर्जावर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी नवलखाचे वकिल कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले की, गौतम नवलखाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले असून गेल्या 93 दिवसांपासून एनआयएने आरोपपत्र देखील सादर केलेले नाही. यावेळी एनआयएचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी नवलखा याला घरातून ताब्यात घेतल्यापासून अटक करण्यात आलेले दिवस मोजण्यात आले आहेत. यातील नजरकैदेचे दिवस ग्राह्य धरता येणार नाहीत. हायकोर्टाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत याबाबत आपला अंतिम नकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज, सोमवारी जाहीर केला. ज्यात एनआयए कोर्टाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत आहोत, तेव्हा मुंबई सत्र न्यायालयानं याबाबत दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे स्पष्ट करत हायकोर्टाने गैतम नवलखाचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.