अहमदनगर/प्रतिनिधीः दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणार्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकर्याने ...
अहमदनगर/प्रतिनिधीः दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणार्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकर्याने गंभीर आरोप केले आहेत. उसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचे या तरुण शेतकर्याने म्हटले आहे. सोनईतील ऋषिकेश शेटे यांनी शेतकर्याच्या मरणाच्या सोहळ्याचे आमंत्रण देतोय, असे म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गडाख हे विरोधक शेतकर्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकर्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकर्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचे ठरवले आहे, इतकेच नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी दखल घेतली नाही, तर उसात आत्मदहन करू असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्षे झाली उसाला तोड नाही असा आरोप या तरुण शेतकर्याने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याला दिलेले मंत्रिपद आमच्या शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे, शंकरराव गडाख हे शेतकर्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकर्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावे, असे ऋषिकेश शेटे यांनी म्हटले आहे. शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकर्यांना प्यायला पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल केला. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघात ही अवस्था आहे, या मुद्द्यावर गावात पाणी, रस्ते मिळावे यासाठी निवडणुकीत पॅनेल उभे केले, त्यामुळे गडाख यांनी उसाला तोड येऊ दिली नाही. उसाला तोड न आल्याने ऊस पूर्णपणे वाकला आहे. गडाख यांना विरोध करणार्या शेतकर्यांची अशाप्रकारे पिळवणूक केली जाते, असा आरोप शेतकर्याने केला. मुळा सहकारी साखर कारखाना हा गडाख यांच्या अख्यारित आहे. त्यामुळे एकीकडे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकर्यांकडे दुर्लक्ष करते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.