अहमदनगर/प्रतिनिधी: हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधीपर्यंतच्या प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक ...
अहमदनगर/प्रतिनिधी: हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधीपर्यंतच्या प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक सोहळा शुक्रवारी संगमनेर तालुक्यात पार पडला. तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता.
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला या गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलिकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्ंया गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील तरुण उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गागरे पुण्यात राहत असले, तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण निघाल्याने गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने मंत्री, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच, उपसरपंच यांचा शपथविधी समारंभ पार पडला. गावच्या विकासाची शपथ घेतली. ‘गावाकडे चला’ हा नारा गांधीजींनी दिला होता, त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी हेलिकॉप्टरने आल्याचे गागरे यांनी सांगितले. गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले, तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना उपस्थित गावकर्यांनी व्यक्त केली.