नवी दिल्लीःखलिस्तान कमांडो फोर्सच्या माध्यमातून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांची हत्या घडवून आणण्य...
नवी दिल्लीःखलिस्तान कमांडो फोर्सच्या माध्यमातून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांची हत्या घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचला जात असल्याचा गौप्यस्फोट भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. केसीएफ या दहशतवादी संघटनेच्या हालचालींकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इंटेलिजेन्स ब्यूरोकडून लक्ष ठेवले जात आहे.
याचसंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारताविरोधात कट रचणारे लोक बेल्जियम आणि ब्रिटनमधील आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांपैकी एकाच्या हत्येचा कट या सर्वांनी मिळून रचला आहे. केसीएफच्या योजनेनुसार शेतकरी आंदोलनामध्ये असणार्या अशा नेत्याची हत्या करण्याचा विचार आहे, की ज्याने पंजाबमध्ये केसीएफ संपुष्टात आणण्याचे काम केले आहे. केसीएफ एक दहशतवादी संघटना असून या संघटनेवर देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. कॅनडा, ब्रिटन, बेल्जियम आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये ही संघटना पसरलेली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार आता एका वरिष्ठ शेतकरी नेत्याच्या हत्येचा कट बेल्जियम आणि ब्रिटनमधील तीन दहशतवाद्यांनी रचला आहे. या नेत्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये हत्या केल्यास भारतामध्ये हिंसा भडकू शकते आणि हत्येचा आरोप सरकारी यंत्रणा किंवा कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केला जाईल, असा विचार केसीएफ करत आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न खालिस्तान समर्थक गटांकडून सुरू आहे. तसेच पाकिस्तानमधून चालवण्यात येणारे 400 हून अधिक ट्विटर हॅण्डलवर भारताने बंदी घातली आहे. या ट्विटर हॅण्डलचा वापर खलिस्तानी समर्थकांची पाठराखण करणे आणि हिंसा भडकवण्यासाठी केला जायचा.