मुंबई/प्रतिनिधीः कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धूमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती ...
मुंबई/प्रतिनिधीः कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धूमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्यानंतरचा, एकही सण साजरा झाला नाही. राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक काढून शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला, तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी, मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, केवळ दहा व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये, आरोग्यविषय उपक्रम आणि शिबीर यांची जनजागृती करावी, सामाजिक अंतर भान आणि स्वच्छताविषयक नियम पाळण्याकडे अधिक लक्ष द्यावे, स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे या नियमावलीत म्हटले आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते; परंतु सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावेत, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, कीर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सुचवले आहे.