पुणे/प्रतिनिधी : फिरायला गेल्यावर तिथले फोटो सोशल मीडियावर टाकता. मग चोरांना घर मोकळेच मिळते. घरी येऊन फोटो कुठे टाकायचे तिकडे टाका, असा सल्...
पुणे/प्रतिनिधी : फिरायला गेल्यावर तिथले फोटो सोशल मीडियावर टाकता. मग चोरांना घर मोकळेच मिळते. घरी येऊन फोटो कुठे टाकायचे तिकडे टाका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पोलिस कुठे कुठे बघणार, असा सवालही त्यांनी केला. शहर पोलिस आयुक्तालयातर्फे किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीस पुन:प्रदान कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी पोलिस आणि नागरिकांच्या चुकांवर बोट ठेवताना त्यांना दोन गोष्टी समजावूनही सांगितल्या. ते म्हणाले, की अंगभर दागिना घालताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण काहीजण बारकाईने लक्ष ठेवून डल्ला मारतात. आपल्या हद्दीत गुन्हा घडणारच नाही ,यासाठी पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसच चोरांना घाबरुन पळून गेले, हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा खराब होते, मनोबल खचते, अशा शब्दांत अजितदादांनी पोलिसांना आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.
पोलिस दलाकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. सामान्य माणसाला पोलिस ठाण्यात जावेच लागणार नाही याची काळजी घ्यावी. टाळेबंदीमध्ये ऑनलाईन गुन्हेगारी वाढली आहे. यासंदर्भात पोलिसांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, की आपली पोलिस यंत्रणा कशी सक्षम होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पोलिसांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही पोलिसांच्या घराचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच मारणेच्या स्वागतासाठी 300 हून अधिक गाड्यांनी एक्सप्रेस वेवर धिंगाणा घातला. त्यावरुन पवार यांनी पोलिसांची कानउघाडणी केली. पुण्यात एका गुंडाची मिरवणूक निघते, हे शहराच्या आरोग्यासाठी चांगले नाही. पोलिसांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पोलिसांना सल्ला देतानाच पवार यांनी काही पोलिस अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. 35 लाखाच्या गाड्या पोलिस अधिकारी वापरतात. मी जेव्हा माहिती घेतली, तेव्हा कुठल्या तरी उद्योगपतीने त्या गाड्या पोलिसांना दिल्या होत्या; मात्र आपण सरकारी अधिकारी आहोत याचे भान राखले पाहिजे. लोकांचे आपल्यावर बारीक लक्ष असते, खासगी आयुष्य कसे जगता ही प्रत्येकाची खासगी बाब असली, तरी आपण सरकारी अधिकारी आहोत, याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी काही पोलिस अधिकार्यांना फैलावर घेतले.