कोलकाता : जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय...
कोलकाता : जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत चालला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये मोदी सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत चालला आहे; मात्र दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारेही आहेत. तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले, की देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी उत्तम आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचे, की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते. तुम्ही केवळ एका विद्यापीठाचा भाग नसून, एका परंपरेचा भाग आहात हे कायम लक्षात ठेवावे. गुरुदेवांनी विश्व भारती विद्यापीठ असे नामकरण करण्यामागे विशेष उद्देश होता. या विद्यापीठातून जी व्यक्ती शिक्षण घेऊन बाहेर पडले, ती भारत आणि भारतीयत्वाबाबत नवीन दृष्टी जगाला देईल, अशी अपेक्षा गुरुदेव यांना होती. भ्रम, त्याग आणि आनंद या मूल्यांवर आधारित या विद्यापीठात भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.