जळगाव/प्रतिनिधी: ’2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावमध्ये चार हजार मतांनी पराभूत झालो; परंतु 2024 च्या निवडणुकीत याची परतफेड करा. महि...
जळगाव/प्रतिनिधी: ’2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावमध्ये चार हजार मतांनी पराभूत झालो; परंतु 2024 च्या निवडणुकीत याची परतफेड करा. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनो झपाट्याने कामाला लागा. 2024 साली ही जागा निवडून यायलाच हवी,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आज पाटील जळगावात होते.
चाळीसगाव येथे पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. ’राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी हे अपेक्षित आहे,’ असं पाटील म्हणाले. ’कार्यकर्त्यांची एक मोठी फळी येथे आहे. नेते व पदाधिकार्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीचे रूपांतर मतांमध्ये करा,’ असेही पाटील म्हणाले. खडसे यांचेही त्यांनी कौतुक केले. ’खडसे यांच्यासारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असे पाटील म्हणाले.’महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यातही तो एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसे जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा. ही जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही,’ असा विश्वास खडसे यांनी या वेळी व्यक्त केला. ’या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झाले ते विसरा आणि कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी भाजपमधील डझनभर खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.