मुंबई/प्रतिनिधी : राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजि...
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, की केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचे समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असे वक्तव्य करीत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते, हे आपल्या देशातील लोकांना माहीत आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झाले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी फडणवीस यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी टीका पवार यांनी केली.
वीज दरवाढीबाबत भाजपच्या उद्याच्या आंदोलनाबाबत पवार म्हणाले, की वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकर्यांची 45 हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ 15 हजार कोटी रुपये शेतकर्यांनी भरायचे आहेत. 30 हजार कोटी रुपये माफ केले आहेत. वीज कंपन्या अडचणीत असतानाही 30 हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या माणसाला राज्य सरकारने आधार दिला आहे. त्यामुळे भाजपच्या उद्याच्या आंदोलनाला काहीही अथ नाही. सेलिब्रेटींनी काय ट्विट करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला घटनेने मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्याबद्दल आम्हाला टिपण्णी करण्याची गरज नाही. उलट एवढे आंदोलन पेटलले असतानाही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्यांना काहीही दिले नाही, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रिपदासाठीच्या प्रस्तावावर पवार म्हणाले, की अशा बातम्यात काहीही तथ्य नसते. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली, तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. त्या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करतो आहोत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचे कारण नाही.