ठाणे/प्रतिनिधी: हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बर्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो; परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी अ...
ठाणे/प्रतिनिधी: हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बर्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो; परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे हा आता संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. ग्रामीण भागात मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु, रेंजरोव्हर, एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात. एवढेच नव्हे, तर अमेरिकेच्या अध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडिल्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे आहे. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे. घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले, तर काही विकासकामांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले आहे. स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात राजस्थान या भागात नेहमी जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी याचा उपयोग होईल. घरी आर्थिक सुबत्ता असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे भोईर यांनी सांगितले. भोईर यांना हेलिकॉप्टर 15 मार्च रोजी मिळणार असल्याने आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे, याची चाचपणी करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर,सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये भोईर यांनी स्वतः न बसता नुकतेट गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींना फेरफटका मारून आणले, याचे कौतुक होत आहे.