लखनऊ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलन करणार्या लोकांना हे सरकार दहशतवादी म्हणते, असे म्हणत...
लखनऊ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलन करणार्या लोकांना हे सरकार दहशतवादी म्हणते, असे म्हणत प्रियंका यांनी मोदी सरकारवर टीका केली. सध्याच्या काळात शेतकर्यांवर सर्वाधिक अन्याय होत आहे. सरकारला कृषी कायदे परत घ्यायचे नाहीत; परंतु सरकारच्या लक्षात येत नाही की, या आंदोलनामुळे शेतकर्यांचे किती नुकसान होत आहे, असे त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधत प्रियंका म्हणाल्या, की, सध्याच्या काळात हुतात्मा लोकांना दहशतवादी म्हटले जाते. शेतकरी आंदोलन आपल्या विरोधात केलेले कारस्थान वाटते. सरकार शेतकर्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे. जर कोणताही नेता आपले म्हणणं ऐकत नसेल, तर तो कोणत्याच कामाचा नाही. आम्हाला अपेक्षा होती, की शेतकर्यांसाठी या सरकारचे दरवाजे उघडतील आणि सुनावणी होईल; पण असे काहीच झाले नाही. जर एखादा नेता गरीबांचा आवाज ऐकू शकत नसेल, तर तो आमचा नेता नाही. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत प्रियंका म्हणाल्या, की शेतकर्यांचे आंदोलन सत्याच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन आहे. हे देशाच्या सर्व शेतकर्यांचे आंदोलन आहे. हे आंदोलन देशवासीयांचे आहे. देशातील सर्व लोकांचे आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आलेले नाही. दरम्यान, प्रियंका गांधी अरदासमधील रामपूर येथे गेल्या होत्या. नवरीत यांचा मृत्यू प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील हिंसाचारादरम्यान झाला होता. नवरीत शेतकरी कुटुंबातील होता आणि शेतकर्यांच्या रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीला गेला होता. रॅली ठरलेल्या मार्गाने न जाता लाल किल्ल्याच्या दिशेने गेली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नवरीत यांचा ट्रॅक्टर पलटला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.