गेल्या वर्षांत कोरोनामुळे देशातील नागरिकांचा रोजगार गेला. कर्जाचे हप्ते वसुलीला सरकार आणि रिझर्व्ह बँकेने स्थगिती दिली. त्यामुळे कर्जाचे प्र...
गेल्या वर्षांत कोरोनामुळे देशातील नागरिकांचा रोजगार गेला. कर्जाचे हप्ते वसुलीला सरकार आणि रिझर्व्ह बँकेने स्थगिती दिली. त्यामुळे कर्जाचे प्रमाण थकले. या पार्श्वभूमीवर बँका चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. बँकांच्या अनुत्पादक मालमत्तांचे प्रमाण 13 टक्क्यांहून अधिक होण्याची भीती रिझर्व्ह बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बँकांच्या थकीत कर्जाच्या वसुलीचा मोठा पेच निर्माण झाला होता. बँकांना त्यातून सावरण्यासाठी उपाययोजना आवश्यक वाटत होती. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगोदर केंद्र
सरकारने बॅड बँकेची स्थापना करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या बँकेच्या स्थापनेची घोषणा केली आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. केंद्र सरकारने 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला होता. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी बॅड बँक स्थापन करण्याची जोरदार मागणी केली होती. एनपीएची समस्या सोडवण्यासाठी बॅड बँकेची गरज आहे. कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक नियमांमध्ये शिथिलता दिली होती. पुन्हा हे नियम लागू केल्यानंतर बँकांच्या बुडालेल्या कर्जांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संकटातून बँकांना बाहेर काढण्यासाठी बॅड बँक सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही बॅड बँक सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात बॅड बँकची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बॅड बँकेला डेव्हल्पेमेंट फायनान्स इन्सिट्यूशनच्या नावानं ओळखलं जाणार आहे.
सरकार गेल्या काही महिन्यांपासून बॅड बँकेवर विचार करत होती. बुडालेल्या कर्जाबाबत समाधानकारक मार्ग काढण्यावर भर देणारी संस्था म्हणून बॅड बँकेकडे पाहिले जाते. ऋणदात्यांकडून गेल्या काही वर्षांपासून बॅड बँकेची मागणी केली जात होती. कठीण प्रसंगात त्यांच्या बुडालेल्या कर्जाचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्याकडून ही मागणी करण्यात येत होती. बॅड बँक ही एक आर्थिक संस्था आहे. बँकांचे बुडित खात्यात गेलेले कर्ज स्वीकारून त्यातून सुनिश्चितपणे मार्ग काढण्याची प्रक्रिया बॅड बँकेकडून केली जाते. बुडालेल्या कर्जाचा ताण कमी व्हावा यासाठी ही मागणी करण्यात येत होती. जगात फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशात बॅड बँका कार्यरत आहेत. या वित्तीय संस्थेचं काम बॅड अॅसेट्सला गुड अॅसेट्समध्ये रुपांतरीत करण्याचे असते. थोडक्यात कर्जाच्या वसुलीची जबाबदारी ही संस्था घेईल. सध्या पतसंस्था चळवळीत अशा काही संस्था आहेत, की ज्या दुस-या अडचणीतील संस्थाच्या थकीत कर्ज वसुलीची जबाबदारी घेतात. त्या बदल्यात या संस्थेला उत्पन्न मिळतं आणि शिवाय थकीत कर्जाची वसुली होत असल्याने जिची जबाबदारी घेतली, तीही अडचणीतून बाहेर येते.