मुंबई/प्रतिनिधीः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांन...
मुंबई/प्रतिनिधीः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांच्याकडे आला आहे.
राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रदेशाध्यक्षपदी पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पटोले यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम यांचे वडील अनंतराव काँग्रेसचे कडवे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नावाला अनुकूल राहील का, याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. सुरेश वारपूडकर यांचे नावही समोर आले आहे. वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषिराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये ते खासदार होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे. अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का, याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा राज्यात आणि दिल्लीत होत होती. गुजरातचे प्रभारी राजीव सातव आणि पटोले या दोन नेत्यांमध्येच खरी चुरस होती. बुधवारी अचानक काँग्रेसचे प्रभाारी एच. के. पाटील आणि पटोले यांची जवळपास दोन तास बैठक झाली. त्यानंतर हे दोन्ही नेते काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना भेटण्याकरिता त्यांच्या नर्मदा येथील निवासस्थानी पोहोचले. या भेटीच्या वेळी राज्याातील काँग्रेस पदाधिकार्यांच्या नावावर अंतिम निर्णण घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. विभागस्तरीय कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. सोबतच ज्या नेत्यांना मंत्रिपद देता आले नाही त्यांची वर्णी कार्याध्यक्षपदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागेवर पटोले यांची नियुक्ती करण्यासंदर्भात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे पेच
विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.