नवी दिल्ली : उद्योगपती तुमची जमीन घेतील असे सांगून देशातील शेतकऱ्यांना भडकवण्यात आलेय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गैरसमज पसरला आहे. संपूर...
नवी दिल्ली : उद्योगपती तुमची जमीन घेतील असे सांगून देशातील शेतकऱ्यांना भडकवण्यात आलेय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गैरसमज पसरला आहे. संपूर्ण जगाला ठाऊक आहे की, शेती पाण्याने होते. परंतु, रक्ताने शेती केवळ काँग्रेस करू शकते भाजप नव्हे अशी घणाघाती टीका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली.
कृषी कायद्याच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांवर हल्ला चढवताना ते बोलत होते. शेतकरी आंदोलनाबाबत राज्यसभेत उत्तर देताना कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे. शेतकरी संघटनांना 2 महिन्यांपर्यंत विचारण्यात आले की कायद्यात काय चूक आहे ? मात्र शेतकरी नेते हे सांगू शकले नाहीत, की कायद्यात काय कमतरता आहे. शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन व्हायला हवे. कायद्यात काय कमतरता आहेत, हे शेतकरी नेत्यांनी सांगावे असा सवाल तोमर यांनी उपस्थित केला. यावेळी पंजाबचा उल्लेख करताना कृषीमंत्री म्हणाले की, भारत सरकार कायद्यात कोणत्याही बदलासाठी तयार आहे, याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कृषी कायद्यात काही चूक आहे. संपूर्ण एका राज्यात लोकं गैरसमजाचे बळी ठरले आहेत. हा एकाच राज्याचा मुद्दा आहे. आम्ही वारंवार सांगितले आहे की एपीएमसी संपुष्टात येणार नाही. मात्र शेतकऱ्यांना भरकटवल्या जात असल्याची टीका तोमर यांनी केली.