अहमदनगर/प्रतिनिधी-पगारवाढीच्या कराराची मुदत संपून एक वर्ष होत असताना देखील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारव...
अहमदनगर/प्रतिनिधी-पगारवाढीच्या कराराची मुदत संपून एक वर्ष होत असताना देखील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्यावतीने कामगारांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सोमवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु केले. पगारवाढीचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी व रमेश जंगले यांनी आंदोलकांची भेट घेऊन या प्रश्नी मंगळवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलकांनी पगारवाढीचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. त्यामुळे आंदोलनाच्यावेळी पगारवाढ न देणार्या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अॅड.सुभाष लांडे, युनिट अध्यक्ष सतीश पवार, लाल बावटा विडी कामगार युनियन उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनीता जावळे, प्रवीण भिंगारदिवे आदींसह कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रतीक बारसे, अरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव शेळके यांनी पाठिंबा दिला. कामगारांच्या पगारवाढीसाठी कोरोनामुळे आर्थिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे. ट्रस्टने कामगारांना परवडेल अशी पगारवाढ देऊ करुन हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. युनिट अध्यक्ष पवार यांनी कामगारांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असून, पगारवाढ प्रश्नी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सात तारखा होऊन देखील प्रश्न सुटत नाही. ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा वाद चिघळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅड. लांडे म्हणाले की, इतर धार्मिक संस्थांच्या तुलनेत मेहेरबाबा ट्रस्टमधील कामगारांना अत्यंत कमी वेतन आहे. किमान उदरनिर्वाह होईल एवढे वेतन कामगारांना मिळणे आवश्यक असून, या न्यायहक्काच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.