नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो...
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे कालच संकेत दिले आहे. पवार यांनी अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एककी पडणार की काय, असा सवाल केला जात आहे.
पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसर्या आघाडीची गरज असल्याचे म्हटले आहे. तिसर्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जीं यांनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर भर दिला आहे; मात्र तिसर्या आघाडीला आकार दिला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.पश्चिम बंगाल सारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्वाकडून हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाहीवादी पक्षांनी ममता यांना पाठिंबा दिला पाहिजे. येचुरी यांचा फोन आला होता. अल्टरनेटीव्ह मंच निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत विचार करा. आपण किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यात काहीच अंतर्विरोध नाही, असे येचुरी यांनी म्हटल्याचे पवार यांनी सांगितले होते. अनेक नेत्यांनी पर्यायी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असे पवार यांनी म्हटले होते. दरम्यान, मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे; मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचे बरेचसे भवितव्य अवलंबून आहे. मोदी यांना रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, शिवसेनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ममता यांना पाठिंबा दिला आहे. या नेत्यांनी केवळ ममतादीदींना पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी ममतादीदींसाठी प्रचार करण्याची तयारीही दर्शवली आहे. पवार यांंच्या प्रयत्नामुळेच विरोधी पक्षांनी ममता यांच्या पाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक प्रचारासाठी व्यापक रणनीती तयार केल्याचे बोलले जात आहे. तृणमूल काँग्रेसनेही मोदींविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली होती. राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधात आघाडी निर्माण व्हावी, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसेतेर पक्षाकडे नेतृत्वाचा आग्रह
2014 पासूनच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गैर भाजप आणि गैरकाँग्रेसी पक्षांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. अनेक प्रादेशिक पक्षांना नव्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे नको आहे. कारण अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांचा थेट काँग्रेसशी सामना आहे. त्यामुळे नव्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसेत्तर पक्षाकडे असावे, असे या पक्षांचे म्हणणे आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये लढत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आमनेसामने आहेत. त्यामुळे काँग्रेसला वगळून नवी आघाडी बनवावी असे मत या पक्षांमध्ये घटत असून असे काही झाल्यास विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पवारांकडे नेतृत्व आले, तरच एकी
पवार यांंचे अनेक राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. टीआरएस, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांसोबत पवार यांचे चांगले संबंध आहेत; मात्र असे असले, तरी हे पक्ष काँग्रेससोबत यायला तयार नाहीत. त्यामुळे या पक्षांनी भाजपशी चांगले संबंध ठेवले आहेत. उद्या आघाडीचे नेतृत्व पवार यांच्यांकडे आल्यास हे पक्ष पवारांसोबत येऊ शकतात, तर जेएमएम, आरजेडी, समाजवादी पक्ष आणि डावे पक्षही पवारा यांच्यासोबत उभे राहू शकतात. त्यामुळे काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसू शकतो. अशात काँग्रेस विरोधी पक्षातच एकाकी पडू शकते, असेही राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे.