मुंबई/प्रतिनिधी: पोलिस दलातील अधिकार्याने पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. 2002 मध्ये डी. जी. वंजारा गुजर...
मुंबई/प्रतिनिधी: पोलिस दलातील अधिकार्याने पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. 2002 मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलिस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलिस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या वेळी शाह यांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलिस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केले होते. त्या वेळी मोदी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले.
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे वातावरण भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण करायचे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा. येनकेनप्रकारेण सत्ता उलथवायची. साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर करून सरकारे पाडायची, असे उद्योग भाजपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्याच वर्षात केले, असे सावंत म्हणाले. विरोधी पक्षाच्या सरकारला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचण्यात भाजपचा हातखंडा आहे. याआधी अनेकदा भाजपने अशी कारस्थाने रचली आहेत, असा दावा सावंत यांनी केला. भाजपचे षडयंत्र स्क्रिप्टेड असते. पोलिस आयुक्त पदावरून दूर झालेले परमबीर सिंग पत्र लिहिणार याची भाजप नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळे आधीपासूनच माहीत होते. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असे सावंत यांनी म्हटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप करणार्या परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल सावंत यांनी शंका उपस्थित केल्या. वाझे फेब्रुवारीत देशमुख यांना भेटल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे; पण देशमुख यांना फेब्रुवारीत कोरोनाची लागण झाली होती. मग ही भेट कशी काय झाली? परमबीर सिंग यांचा निकटचा सहकारी असलेला सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिंग यांचीदेखील चौकशी होऊ शकते. त्याची भीती असल्याने त्यांनी आता आरोप केले आहेत का? याआधी ते गप्प का होते? चौकशी होणार असल्याचे लक्षात येताच आपल्या सहकार्यांसोबत चॅट करून ते पुरावे गोळा करत होते का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.