नवीदिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. आम आदमी सरकारकडून ’मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रे...
नवीदिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. आम आदमी सरकारकडून ’मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रेशन’ ही योजना सुरू करण्यात येणार होती. येत्या 25 मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती; परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारने स्थगिती आणली आहे.
केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. तसेच ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. केजरीवाल सरकारने यासाठी निविदाही काढली होती. तसेच ही योजना 25 मार्चपासून सुरू करण्यात येणार होती. केंद्राच्या या निर्णयानंतर मोदी सरकार रेशन माफियांना संपवण्याच्या विरोधात का आहे, असा सवाल दिल्ली सरकारने केला. दिल्ली सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भात माहिती देण्यात आली. यानुसार केंद्र सरकारने दिल्लीत 25 मार्चपासून सुरू होणार्या रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर स्थगिती आणली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत केंद्र सरकार राज्यांना रेशन देत असते. त्यामुळे यात कोणताही बदल करता येणार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केजरीवाल सरकारने गेल्याच आठवड्यात 25 मार्चपासून रेशनची डोअर स्टेप डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीमापुरी सर्कल भागातील 100 घरांमधअये रेशन पोहोचवण्यासोबतच मुख्यमंत्री प्रत्येक घरात योजनेचा 25 मार्च रोजी प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला होता. अन्य क्षेत्रांमध्ये ही योजना एक एप्रिल पासून सुरू करण्यात येणार होती. ही योजना सुरू केल्यानंतर दिल्लीत रेशनमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन माफियांचा अंत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला होता. ही योजना यापूर्वीच सुरू करण्यात येणार होती; परंतु बायोमॅट्रिक मशीन लावण्याचे काम पूर्ण न झाल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.